सोलापूरपासून ७५ किमी अंतरावर असलेले पंढरपूर तिथल्या विठ्ठल मंदिरामुळे भूवैकुंठ म्हणून ओळखले जाते. जनसामान्यांचा देव म्हणून ख्याती असलेल्या विठ्ठलाचे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असे मंदिर पंढरपूरात आहे. केवळ वैष्णवांचा नाही तर सगळ्यांचाच देव म्हणून या मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येथे येत असतात. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील संतपरंपरेत आणि साहित्यात पंढरपूरचा उल्लेख अतिशय आदराने आणि भक्तिभावाने केलेला आढळतो. पंढरपूरची वारी ही देखील फार मोठी जगप्रसिद्ध अशी परंपरा आहे.